संजीव धामणे नांदगावजागतिक जलसंपत्ती दिनाचे औचित्य साधून पाणी संवर्धनाचे व संरक्षणाचे महत्त्व विविध पातळ्यांवरून कानीकपाळी ओरडून सांगितले जाणार आहे. केवळ दिन साजरा करण्यापुरते ते असू नये. तो एक संस्कार व्हावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येकानेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे.पाण्याचा पिण्यापासून तर शेती, औद्योगिक विविध कारणांसाठी उपयोग आहे. मान्सूनचे अवेळी येणे व पुरेसा पाऊस नसणे यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. गावोगावीचे जलस्त्रोत कोरडे पडल्याने, गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या जलाशयांमधून पाणी आणावे लागत आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुका हे त्याचे मासलेवाईक उदाहरण ठरावे. येथील नद्यांचे स्त्रोत कमी होत चालल्याने शेती व्यवसाय घायकुतीस आला आहे. नव्याने स्थायिक होणारे नांदगाव व मनमाड शहरांचा विचार सोडून इतरत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत.नांदगाव शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी गळतीमुळे वाया जाते असा अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे होणारे दिन आजकाल शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देऊन साजरे होत असतात. मात्र घरोघरी हा संदेश पोहोचण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे.शीतावरून भाताची परीक्षा हे तत्त्व मान्य केले तर नांदगावसारख्या ठिकाणी पाण्याची मागणी व पुरवठा यात मोठी दरी आहे. ती दरी केवळ नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने आहे असे नाही तर अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळेसुद्धा आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. चुकीच्या व्यवस्थेमध्ये हजारो व लाखो लिटर पाणी वाया जाते. अभियांत्रिकी अपयशामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. अलीकडची माणिकपुंज योजना हे अभियांत्रिकीचे मोठे अपयश असल्याचे मानले जाते.जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्त वाया जाणाऱ्या पाण्याचा स्रोत थांबविण्याची गरज आहे. गुरुकृपा- नगरासारख्या गळत्या व कमकुवत, तकलादू व्यवस्था बदलण्याची शपथ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतली तरी खऱ्या अर्थाने जलसंपत्ती दिन साजरा केल्यासारखा होईल.
काटकसरीने पाणी वापरण्याची गरज
By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST