आझादनगर : मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातील पाणी आरक्षणाबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियोजन प्राधिकरण यांच्या मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत पाणी आरक्षणाबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र प्राधिकरणाने आपला निर्णय राखूव ठेवला असून, याबाबत निकालाची तारीख जाहीर केलेली नसली तरी मालेगावकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैठकीत सहकार राज्य मंत्री दादा भुसे, काँग्रेस आमदार आसीफ शेख, उन्मेश पाटील यांनी आपली बाजू मांडली.मालेगाव शहरास चणकापूर धरणातून पाणी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहेत; परंतु चणकापूर धरणातून तळवाडे धरणात आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात येते. म्हणून तळवाडे धरणापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाणी वीजपंपाद्वारे उचलण्यात येते. त्यामुळे शहराच्या हक्काच्या पाण्यामध्ये कमतरता होते. म्हणून गिरणा धरणातून मालेगाव शहरास पाणी देणे अत्यावश्यक आहे, असा युक्तिवाद राज्य मंत्री दादा भुसे यांनी केला.आमदार आसीफ शेख यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले की, १९९७ मध्ये गिरणा धरणातून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करतेसमयी ९०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्याचा करारनामा झालेला आहे; परंतु कमी प्रमाणावर झालेल्या पावसामुळे गिरणा धरण पूर्णक्षमतेने भरू शकलेले नाही. यामुळे पाणी कमी मिळत आहेत. परंतु राजकीय दबावामुळे प्राधिकरणाच्या बैठकीपूर्वीच जळगाव जिल्हा पालकमंत्री एकनाथ खडसे व जिल्हाधिकारी जळगाव यांनी पाणी आरक्षणाबाबत बैठक घेऊन मालेगाव शहरास फक्त १५० दलघफू पाणी आरक्षित केल्याचे जाहीर करीत माहिती प्राधिकरणापुढे ठेवण्यात आली. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्याने आम्हास पालकमंत्र्यांच्या आश्वासनानुसार किमान ४०० दलघफू पाणी देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनीही मालेगाव शहरास ४०० दलघफू पाणी देण्यास सहमती दर्शविली. बैठकीत जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी भूमिका मांडली. आज सुनावणी पूर्ण होवून निर्णय मात्र राखूव ठेवण्यात आले आहेत. सहकार राज्य मंत्री दादा भुसे व आमदार आसीफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने आणि चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी यास सहमती दर्शविल्याने मालेगावकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (वार्ताहर)आजच्या बैठकीत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, आमदार राहूल आहेर, आमदार जीवा पांडू गावीत, गुलाबराव पाटील, किशोर पाटील, मालेगाव मनपाचे आयुक्त किशोर बोर्डे, नाशिक जिल्हाधिकारी कुशवाह, जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मुंबईच्या बैठकीत पाणी आरक्षण सुनावणी पूर्ण
By admin | Updated: December 1, 2015 23:27 IST