नाशिक (प्रतिनिधी)- एमबीबीएस तृतीय वर्षाच्या ईएनटी विषयाचा पेपरफुटीची दखल घेत विद्यापीठाने सदर परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असून, सदर विषयाची परीक्षा येत्या ५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली. लातूर येथील पेपरफुटीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाने तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली होती. तसेच संबंधित केंद्राला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. याप्रकरणी विद्यापीठाने अज्ञाताविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सायबर क्राइमकडे सोपवावा, अशी मागणीदेखील केली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने व्हॉटस् अपवरील ‘ते’ प्रश्नदेखील हस्तगत केली असून, सदर माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, फेर परीक्षेच्या नियोजनाबाबत संबंधित विषयांच्या परीक्षार्थींना माहिती देण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठाने महाविद्यालयांना केले आहे. सदर विषयाच्या फेर परीक्षेच्या नियोजनानुसार दि. ५ रोजी दुपारी २.३० ते ४.३० यावेळेत सदर पेपर्स घेतले जाणार आहेत. दिलेल्या प्रवेशपत्रावरच विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या केंद्रावरच होणार आहे.
एमबीबीएसचा ‘तो’ पेपर ५ रोजी
By admin | Updated: December 2, 2014 00:51 IST