मनमाड : नवरात्रोत्सवात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दुर्गांनी रात्री थेट वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बराच वेळ सुरू असलेल्या या आंदोलनानंतरही कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित न झाल्याने अधिकाऱ्यांच्या या ‘दांडिया’मुळे आंदोलक महिलांचा संताप अनावर झाला.सण समारंभ काळात रात्रीचे भारनियमन करू नये अशा सूचना असतानाही गणेशत्सवाप्रमाणेच नवरात्रातही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्याची आपली परंपरा वितरणने जोपसली. आज रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नवरात्र उत्सवावर काळोखाचे सावट पसरले. यामुळे दांडिया खेळाला सुद्धा अडथळा निर्माण झाला. बराच वेळ वाट पाहून ही विज पुरवठा सुरू न झाल्याने अखेर गांधी चौकातील संतप्त महिलांनी थेट विज वितरणच्या एफसीआय रोड वरील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी निषेधाच्या घोेषणा देण्यात आल्या.बराच वेळ आंदोलन करून ही कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित न झाल्याने महिलांच्या संतापाचा पारा अनावर झाला. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवळी यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढली. वीज वितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)
मनमाड : नवरात्रोत्सवात वीजपुरवठा खंडित;
By admin | Updated: September 28, 2014 23:32 IST