त्र्यंबकेश्वर : गोदावरी स्वच्छ राहावी असे वाटत असेल प्रथम ब्रह्मगिरीच्या पोटाशी बांधकामे, खोदकामे करून माती काढू नका, जेणेकरून भरावामुळे गोदावरीचे पाणी दूषित होणार नाही. नदीपात्र तर दूषित नकोच. गोदावरीला पवित्र मानतात, तिचे पावित्र्य राखा, असे आवाहन महंत ग्यानदास महाराज यांनी केले. बुधवारी महंत ग्यानदास यांचे त्र्यंबक नगरीत आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अहिल्या गोदावरी घाटाची पाहणी केली. तेथून कुशावर्त तिर्थावर गेले. विशेष म्हणजे कुशावर्त तीर्थात उतरण्यास त्यांनी नकार दिला. नंतर आग्रहास्तव उतरून आचमन केले. शहरातील कामकाजाबद्दल त्यांनी अनेक सूचना केल्या. त्र्यंबकेश्वर येथे त्यांचे आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी हरित लवादाचे राजेश पंडित, ललिता शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी त्यांच्या गावातील कोणीही साधू-महंत उपस्थित नव्हते. उलट दशनाम गोटात नाराजी पसरली आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यक्षेत्रात आम्ही सक्षम आहोत. त्र्यंबकच्या दहा अखाड्यांतील साधू येथील प्रशासनाशी संवाद साधून असून, कुंभमेळा व्यवस्थित होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. बाहेरच्यांनी येऊन प्रशासनाने काय करावे, काय करु नये असे सुचवू नये. यासाठी आम्ही खंबीर असल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले. (वार्ताहर)
महंत ग्यानदास : त्र्यंबकेश्वर येथे भेट
By admin | Updated: January 8, 2015 01:07 IST