नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावरील नासाका कर्मचारी पतसंस्थेने कारखान्याकडील थकबाकीपोटी सील केलेली साखरपोती बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करून कारखान्याचे तब्बल ४४ लाखांचे नुकसान केल्याचा आरोप नासाकाचे अध्यक्ष, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केला आहे.केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वकील फी ५० हजार ते एक लाखाच्या आसपास देणे अपेक्षित असताना, ती तब्बल ५५ लाख रुपये देऊ केल्याने कारखान्याचे मोठे नुकसान कर्मचारी संघटना करीत असल्याचे पिंगळे यांचे म्हणणे आहे. २८ जुलै रोजी कारखाना पतसंस्थेने कारखान्याकडे थकीत असलेल्या रकमेपोटी जप्त केलेल्या २० हजार क्ंिवटल साखरेचा कोर्टाच्या प्रतिनिधींमार्फत टेंडरद्वारे कारखाना कार्यस्थळावर लिलाव केला. लिलावाकरिता घोेटी, त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड येथील व्यापारी उपस्थित होते. लिलावात किमान २९०० रुपयांच्या पुढे बोली लावावी असे सांगितले असताना, प्रत्यक्षात व्यापारी व संबंधितांनी साटेलोटे करून २५०० पासून बोली लावून घोटी येथील व्यापारी गुलाबचंद श्रीश्रीमाळ यांना २८११ अशी बोली केली. संस्थेच्या सचिवांनी न्यायालयाचे प्रतिनिधी यांना सांगितले की, आपणास साडेपाच कोटी मिळतात, साखर देऊन टाका. प्रत्यक्षात कारखाना पतसंस्थेस केवळ एक कोटी १७ लाखांचेच देणे असताना ही साखर विक्री करून कारखाना डबघाईस आणण्याचे काम करण्यात आल्याचे पिंगळे यांचे म्हणणे आहे. २८ जुलै २०१४ रोजी एम-३० साखरेचा दर ३१०० रुपये असताना १२ हजार ७०० पोती साखर २८११ रुपये दराने विक्री करून नासाकाचे या कर्मचाऱ्यांनी ३६ लाख ७० हजारांचे नुकसान केले. (प्रतिनिधी)
कमी दराने साखर विक्रीने ४४ लाखांचे नुकसान
By admin | Updated: July 31, 2014 00:52 IST