इगतपुरी : मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून, येथे अनेक सुविधांची वानवा आहे. याठिकाणी त्वरित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील इगतपुरी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन १८८५ च्या आसपास ब्रिटिशांनी रेल्वे उभारण्याचे काम घेतल्यानंतर त्यांच्याच कारकीर्दीत इगतपुरी शहराची निर्मिती झाली.वाफेचे इंजिन धडधडून ठाण्यापर्यंत मुंबईहून आलेली रेल्वे घाटमाथा फोडून कसारा घाटातून इगतपुरीपर्यंत वर चढवून आणण्यासाठी ब्रिटिश यंत्रणा सज्ज झाल्यावर सर्वेक्षण करण्याच्या निमित्ताने वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांचे इगतपुरीत येणे-जाणे सुरू झाले.दरम्यान, कसारापर्यंत रेल्वेगाडी पोहचल्यानंतर कसारा ते इगतपुरी दरम्यान डोंगर फोडून घाट तयार करण्याच्या कामासाठी ब्रिटिशांनी इगतपुरीत तळ ठोकला. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही गोलार्धात ब्रिटिशांचे साम्राज्य होते. जगभरातील लोक एकत्र करून ब्रिटिशांनी रेल्वेसारखा जागतिक प्रकल्प हाती घेतला होता.यानिमित्ताने इगतपुरीच्या रेल्वे खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून केलेल्या नेमणुकांसाठी इंग्रज, पोर्तुगीज, गोवेकर पारशी, इराणी मुस्लीम यांच्यासह स्थानिक लोकांच्या नेमणुका केल्यामुळे या सर्वांनी आपापली संस्कृती इगतपुरीत जपली.(वार्ताहर)