नाशिक : साहित्यात संस्कृतीपुढचे प्रश्न तीव्रतेने मांडले जात नाहीत. साहित्य हे रंजनात्मक नव्हे, तर जीवनदर्शी असले पाहिजे. आपला शब्द, अनुभव आपला असला पाहिजे. माणूसपण शोषून घेणाऱ्या संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी सावानाच्या वतीने आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात आयोजित ४७ व्या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व एशियाटिक लायब्ररीच्या उपाध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन होत्या. यावेळी अनिल अवचट यांनी ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर बोलताना सांगितले, आपण समाजात जितके खोलवर जाऊन वेध घेऊ तितके साहित्य सकस होणार आहे. दुसऱ्यांचे जीवन जाणण्याची संवेदना माणसात आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, शिवराम कारंथ यांसारख्या लेखकांच्या साहित्यात माणसांचे अस्सल चित्रण दिसून येते. आपल्या मराठी साहित्यात ते अलीकडे आले. निसर्गाचा रसरशीतपणाही आपल्या साहित्यात नाही. पूर्वी फडके-खांडेकर यांच्यापलीकडे साहित्य जात नव्हते. १९६० नंतर बांध मोकळे झाले. दलित आत्मनिवेदनानंतर एक चांगली कादंबरी दिसून येत नाही. आपल्याकडे लांब पल्ल्याचे घोडे का निर्माण होत नाहीत, असा प्रश्नही अवचट यांनी उपस्थित केला. संस्कृतीचे वस्त्र रक्ताच्या डागाने डागाळलेले आहे. कल्पक माणसाचे रूपांतर ग्राहकात झाले आहे. अंधानुकरण हा एक मंत्र झाला आहे. साहित्यात समाजाला पुढची दिशा दाखविण्याचे काम झाले पाहिजे. भाषांतरित चांगले साहित्य आले पाहिजे. दुर्दैवाने त्यात सनसनाटीपणाच अधिक दिसून येतो. मातृभाषेतून संस्कृतीचे वहन होत असते. एका संस्कृतीचे भरणपोषण झाले की दुसरी संस्कृती स्वीकारता येते. मराठी माध्यमाच्या शाळा जगल्या पाहिजे, असा आग्रहही अवचट यांनी धरला. प्रारंभी अवचट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अवचट यांचा परिचय अरुण ठाकूर यांनी करून दिला. व्यासपीठावर मेळाव्याचे मावळते अध्यक्ष कवी खलील मोमीन, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीवनदर्शी साहित्यनिर्मिती व्हावी
By admin | Updated: September 29, 2014 00:18 IST