नाशिक : जलालपूर शिवारातून मुंगसरा फाट्याकडे जाण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर असलेला दगडी पूल गेल्या शुक्रवारी कोसळल्याने जलालपूर-मुंगसरा ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. सदर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, डाव्या कालव्यावर असलेला जुना दगडी पूल गेल्या शुक्रवारी (दि. १ आॅगस्ट) सकाळी पावसामुळे कोसळला. पूल जुना असल्याने त्याची दुर्दशा झालेली होती. या पुलावरून जलालपूर शिवारातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी मुंगसरा फाट्याकडे रोज ये-जा करतात, तसेच मुंगसरा फाट्याकडील शेतकऱ्यांची शेतमालाची वाहनेही ये-जा करत असतात. ग्रामस्थांना हाच एकमेव पूल दळणवळणासाठी उपलब्ध आहे. आता पूल कोसळल्याने आणि शेतकऱ्यांना जलालपूर शिवार ते मुंगसरा फाट्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने शेतमाल नाशिकला नेण्यात अडथळे उत्पन्न होत आहेत. त्यामुळे शेतमाल पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पावसामुळे सध्या कालव्यातून पाणी वाहत असते. त्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुलांना मार्गक्रमण करणे धोकादायक बनले आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचा संपर्क तुटल्याने कामे ठप्प झाली आहेत. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता पूर्ववत करण्यासाठी लवकरात लवकर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी जलालपूरचे सरपंच रमेश डंबाळे, सोमनाथ निंबारे, शांताराम निंबारे, निवृत्ती जगताप, सुरेश जगताप, भोलेनाथ भागरे, मधुकर भडिंगे, अशोक कडाळे, बबाजी ढोणे आदि ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)
डाव्या कालव्यावरील पूल कोसळला
By admin | Updated: August 7, 2014 01:40 IST