पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चोरीस गेल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून खळवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृत्रिम पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.अकरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे खळवाडी, राजवाडा भागातील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सार्वजनिक विहिरीतून पाणी ओढून काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या विहिरीतील पाणी खोलवर गेले आहे. पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने खासगी टॅँकरची मागणी वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मुख्य जलवाहिनीस नवीन व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गोरख पायगुडे, संपत पगार, माधव पगार, रामनाथ पगार, दिगंबर पगार, नीलेश पगार, बाळू जाधव, अक्षय जाधव, दिनकर कलकत्ते आदिंसह खळवाडी भागातील महिलांनी दिला आहे. (वार्ताहर)
खळवाडीचा पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Updated: March 30, 2017 22:50 IST