नाशिक : व्यसनाधिनता, जुगार-सट्टा, मांसभक्षण, व्यभिचार हे चार अधर्म कलियुगामधील असून, यापासून मनुष्यप्राणी जर स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी झाला तर त्याचा परमेश्वर प्राप्तीचा व प्रगती आणि यशाचा मार्ग सुकक र होतो, असा उपदेश श्रीकृष्णचंद्र शास्त्री ऊर्फ ठाकूरजी यांनी केला.श्री राधाकृष्ण गुरुगौरांग सेवाभावी ट्रस्ट, नाशिकच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित श्रीमद् भागवत कथा व सामूहिक पारायण सोहळ्याला आजपासून प्रारंभ करण्यात आला, यावेळी शास्त्री महाराज ‘श्रीमद् भागवत माहात्म्य’ या विषयावर प्रवचन देत होते. मानवाने परमेश्वर प्राप्तीसाठी कलियुगातील चारही अधर्मांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्याची व समाजाची प्रगती-विकास घडून येणे अशक्य आहे. दरम्यान, त्यांनी भगवान विष्णू यांचे २४ अवतारांचे माहात्म्य त्यांनी यावेळी सांगितले. गोरक्षा-सेवा, अनाथालय आणि मंदिराचे निर्माण या कार्यासाठी सदर सेवाभावी संस्थेच्या वतीने ही धार्मिक प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमदास प्रभू, कृष्णचंद्र पांडे, धर्मेंद्र नाकरारी, राजेश पारिक, नरेश गुप्ता, हरिश मकवाना यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या कथेच्या पहिल्या सत्राचा समारोप आरतीने करण्यात आला. येत्या मंगळवारपर्यंत (दि. १३) रोज दुपारी तीन ते सात वाजेदरम्यान परिक्षित जन्म व सुकदेव यांचे आगमन, ध्रुव चरित्र, जडभरत कथा, श्रीवामन जन्म, श्रीराम-कृष्ण जन्म व नंदोत्सव, श्रीकृष्ण लीला, श्री गोवर्धन पूजा, श्री महारास लीला, श्री सुदामा चरित्र या विषयांवर शास्त्रीजी प्रवचनमालेमधून प्रकाशझोत टाकणार आहेत. (प्रतिनिधी)
चार अधर्मांपासून स्वत:ला दूर ठेवा
By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST