रेडगाव खुर्द : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया व साथीच्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काजीसांगवी प्राथमिक आरोग्यकेंद्र व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून फेरी काढून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. पावसाळ्यातील दलदल, ठिकठिकाणी साचणारे पाणी आदि कारणांमुळे डास तयार होऊन साथीचे आजार पसरण्याचा संभव असतो. तसेच स्वच्छ पाण्यावर तयार होणाऱ्या डेंग्यूच्या डासामुळे डेंग्यूचा आजार बळावण्याची अधिक शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या आजारांच्या प्रतिबंधासाठी व वैयक्तिक, कौटुंबिक, सामजिक आरोग्य चांगले राखण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत काजीसांगवी प्राथमिक आरोग्यकेंद्र व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात फेरी काढण्यात आली. उघड्यावरील नारळाच्या करवंट्या, टायर आदिचा नायनाट करा, साचणाऱ्या पाण्यात गप्पी मासे टाका, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा आदि घोषणांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देवढे यांनी आजाराची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची माहिती देऊन नागरिकांना व विद्यार्थ्यांना आपापल्या कुटुंबात आठवड्यात एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक व्ही.के. सोनवणे, शिक्षक वृंद, आरोग्य कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. १५ जून ते १५ जुलैदरम्यान आरोग्य केंद्रांतर्गत २७ गावांमध्ये पावसाळी आजार व प्रतिबंध, उपाययोजना आदिंबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
कोरडा दिवस पाळा, डेंग्यू टाळा
By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST