नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधु-संतांबरोबरच चोऱ्यामाऱ्या करणारेही पर्वणी साधण्याची शक्यता असल्याने लाखोंच्या गर्दीत त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होणार असल्याचे पाहून पोलीस यंत्रणेने आत्तापासूनच त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना तयार केल्या आहेत. नियमित पोलीस बंदोबस्ताबरोबरच परराज्यांतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी त्या त्या राज्यांतील पोलीस पथक तसेच दुभाषकांची मदत घेण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीन महिन्यांच्या काळात शहरात लाखो लोकांचा राबता असेल पण त्यामानाने त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही सोय नसणार अशा वेळी समाजकंटक वा भामट्यांकडून लुटमार, चोऱ्यामाऱ्या होण्याची अधिक शक्यता आहे. पाकिटमारी, सोनसाखळी चोरी त्याचबरोबर महिलांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी भामट्यांकडून ‘पर्वणी’ साधणे अधिक शक्य होणार असल्याने एकीकडे कुंभमेळ्यातील बंदोबस्ताचा ताण तर दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारी घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे उभे ठाकणार असल्याने त्याचा विचार करून पोलीस आयुक्तालयाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे ठरविले आहे. दोन पोलीस उप आयुक्त व दोन सहायक आयुक्त यांच्याबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस बळापैकी काही पोलीस बळ सिंहस्थाव्यतिरिक्त कामासाठी म्हणजेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी वापरण्यात येणार आहे. ज्यांची गुन्हेगारी नियंत्रणासाठी नेमणूक केली जाईल त्यांच्यावर सिंहस्थाचा बंदोबस्त देण्यात येणार नाही. स्थानिक पोलिसांची बहुधा यासाठी नेमणूक केली जाईल जेणेकरून स्थानिक गुंड, गुन्हेगारांची ते ओळख पटवू शकतील असा त्यामागचा हेतू आहे. परंतु या काळात पर जिल्ह्यातून तसेच पर राज्यातूनही आंतरराज्यीय गुन्हेगार येण्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेऊन जेरबंद करणे अवघड असल्याने प्रत्येक जिल्ह्यातून एक पथक बोलविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर राज्यांतील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही पाचारण केले जाईल, विशेष करून ज्यांना भाषेचे ज्ञान आहे अशांना याकामी प्राधान्य असेल. बऱ्याचशा वेळेस परप्रांतीय गुन्हेगारांकडून माहिती काढणे भाषेमुळे अशक्य होते, ते टाळण्यासाठी त्या त्या भाषेतील पारंगत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यास भाषेचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. पर्वणी काळात पोलीस यंत्रणा करणार असलेल्या प्रयत्नांमुळे चोरट्यांना पर्वणी साधणे अशक्य होईल असा दावा केला जात आहे. विशेष करून साध्या वेषातील पोलीस महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिकच काळजी घेतील. (प्रतिनिधी)
चोरट्यांना ‘पर्वणी’ साधणे अशक्य
By admin | Updated: July 2, 2015 00:06 IST