सुदीप गुजराथी
नाशिकअनाथ बालकांचा सांभाळ करणाऱ्या काही संस्थांची मनमानी सुरू असताना, जिल्ह्यातील एक संस्था गैरकारभारामुळे आधीच बंद पडली आहे. आणखी एका संस्थेत महिला व बालकल्याण विभागाकडून संगोपनासाठी बालके ठेवली जात नाहीत, तर तीन संस्था बंद करण्यासाठी अर्ज दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात अनाथ बालकांचा सांभाळ करणाऱ्या २८ संस्था आहेत. या संस्थांत सुमारे सोळाशे अनाथ बालके वास्तव्य करतात. प्रत्येक संस्थेत ५० ते १०० मुला-मुलींचा सांभाळ केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून यांपैकी काही संस्थांना ग्रहण लागले आहे. शहरातील पेठरोडच्या तवली फाटा येथील जय आनंद अनाथाश्रमात गेल्या वर्षी मार्चमध्ये मुलींबाबत गैरप्रकार घडल्याने ही संस्था महिला व बालकल्याण विभागानेच बंद करून तेथील मुले-मुली अन्यत्र स्थलांतरित केल्या. मनमाडच्या ‘मनोरमा सदन’ येथून झालेल्या मुलीच्या अपहरणाचे प्रकरण पंधरवड्यापूर्वी गाजले. तेथेदेखील महिला व बालकल्याण विभागाने मुले ठेवलेली नाहीत. संस्थेतील कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने सध्या संस्थेत मुले ठेवू नयेत, असे या संस्थेच्या वतीनेच सांगण्यात आले आहे. या दोन्ही संस्थांमधील मुले अन्य संस्थांत हलवावी लागली आहेत. परिणामी, काही संस्थांमध्ये काही दिवस का होईना, क्षमतेपेक्षा अधिक मुले ठेवावी लागल्याचे वृत्त आहे. सध्या जिल्ह्यातील एकाही संस्थेत क्षमतेपेक्षा अधिक मुले-मुली नसल्याचा दावा महिला व बालकल्याण विभागाने केला आहे; मात्र अशा संस्था बंद होत राहिल्यास हा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या संस्थांची संख्या वाढल्यास सुरू असलेल्या संस्थांतील मुलांच्या संख्येचा ‘कोटा’ वाढविला जाईल, असे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.