सातपूर : औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात असूनही पोलीस यंत्रणा कोणतीही दखल घेत नाही. पोलीस प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून उपयोग झाला नाही. आता आंदोलन छेडण्याचा इशारा बसपाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत अवजड वाहने, कंटेनर्स नेहमीच रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग केली जातात, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. विविध कारखान्यांत कामावर येणाऱ्या आणि कामावरून घरी जाणाऱ्या कामगार, उद्योजकांना या अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. ही वाहने रस्त्याने जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असतो. या वाहनांच्या धडकेने अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या शनिवारी एका वाहनचालकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने तो चालक जागीच गतप्राण झाला. याबाबत आतापर्यंत १ फेब्रुवारी २००८, ४ नोव्हेंबर २००९, १० आॅगस्ट २०१०, २५ आॅगस्ट २०१५ अशा प्रकारची निवेदने पोलीस आयुक्तांना आणि वाहतूक शाखेला देण्यात आलेली आहेत; मात्र या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने अवजड वाहनांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे आणि निष्पाप लोकांचा बळी जात आहे. आता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बसपाचे बजरंग शिंदे, अरुण काळे, माजी नगरसेवक ज्योती शिंदे, सुजाता काळे, कैलास सोनवणे, आप्पा आव्हाड, देवीदास अहिरे, संजय तायडे, गणेश झणकर, विक्रम शिंदे, समाधान साळवे, संतोष जाधव, रवि मोरे, प्रमोद वाघमारे, शांताराम सोनवणे, देवराम पगारे, ज्ञानेश्वर बरावे, अशोक पवार आदिंसह नागरिकांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)
अवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ
By admin | Updated: November 24, 2015 22:43 IST