पंचवटी : मुंबईहून भाजीपाला विक्रीचे पैसे घेऊन घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्यावर हल्ला करून डोळ्यात मिरची पूड फेकून दोघा भामट्यांनी साडेसहा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना पेठरोडवरील मोतीसुपर मार्केटजवळ घडली आहे. भरवस्तीत रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. लुटारूंनी केलेल्या हल्ल्यात व्यापारी विनोद अग्रहरी हा जखमी झाला असून, त्याला दिंडोरीरोडवरील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, मोतीसुपर मार्केट इमारतीत राहणारे विनोद सदाशिव अग्रहरी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून, ते मुंबईला भाजीपाला माल पाठवितात. काल ते भय्याराम यादव व रामप्रसाद अग्रहरी यांच्यासमवेत मुंबई-दादर येथे भाजीपाला मालाचे पैसे घेण्यासाठी गेले होते. रात्री ते पेठफाटा येथे बसने उतरले आणि तिघेही जण घराकडे (मोतीसुपर मार्केट)कडे पायी निघाले मोतीसुपर मार्केटजवळ येताच पाठीमागून आलेल्या दोघांनी विनोद अग्रहरी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व त्यानंतर कशाने तरी डोक्यावर प्रहार केला व अग्रहरी खाली पडताच त्यांच्या हातात रोकड असलेली बॅग हिसकावून पळवून नेली. यावेळी अग्रहरी यांच्यासमवेत असलेल्या दोघांनी जीव वाचविण्यासाठी इमारतीत पळ काढला व चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यानंतर इमारतीत जागे झालेले रहिवासी खाली उतरले, मात्र तोपावेतो लुटारूंनी बॅग घेऊन पलायन केले होते. लुटारू हे रात्रीपासूनच पाळत ठेवून होते रोकड लुटल्यानंतर संशयितांनी भक्तिधामकडे पलायन करून तेथून दुचाकी घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर अग्रहरी यांना जखमी अवस्थेत दिंडोरीरोडवरील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन लाख रुपयांची रोकड चोरी गेल्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)
साडेसहा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना
By admin | Updated: December 29, 2014 01:32 IST