घोटी : एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि निसर्गाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षलागवडीला शासन प्राधान्य देऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’चे आवाहन करीत असताना इगतपुरी तालुक्यात मात्र शासनाच्या या उपक्रमालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे. तालुक्याच्या आदिवासी व दुर्गम भागातील वनसंपदा नष्ट करण्यासाठी लाकूडमाफियांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून, आंबेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेकडो झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून लाकूड चोरीसाठी वापरण्यात येणारा ट्रक वनविभागाने जप्त केला आहे, तर लाकूडमाफिया फरार झाला आहे.आंबेवाडी या इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीतील झाडे विनापरवाना तोडून ती चोरून नेण्याचा प्रकार लाकूडमाफियांच्या दहशतीखाली सर्रासपणे सुरू आहे. येथील देवराम पांडू सदगीर यांच्या जमिनीवरील नाशिक येथील एका लाकूडमाफियाने शेकडो झाडांची कत्तल केल्याची तसेच तोडलेले लाकडाचे ओंडके ट्रकमध्ये (क्र . एमएच ०४ बीजी ८५२) भरून चोरून नेत असल्याची बाब सदगीर यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत शेतावर जाऊन वृक्षतोडीला विरोध केला; मात्र या विरोधाला न जुमानता वृक्षतोड चालूच ठेवली. अखेर त्यांनी इगतपुरीचे वनअधिकारी रमेश ढोमसे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. त्यांनीही तत्काळ हालचाली सुरू केल्या व लाकूडचोरीसाठी वापरण्यात येणारा ट्रक मुद्देमालासह जप्त केला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड करणारा माफिया मात्र फरार झाला आहे. वनविभाग त्याचा शोध घेत आहे. याबाबत देवराम सदगीर यांनी वनविभागासह घोटी पोलिसांत तक्रार दिली आहे.(वार्ताहर)
आंबेवाडी येथे बेकायदा बेसुमार वृक्षतोड
By admin | Updated: January 20, 2017 00:35 IST