बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील नांदगाव बुद्रूक येथील ब्रिटिशकालीन दारणा धरणाजवळ बागाईत शेतीत रानडुकरांचा धुडघूस वाढल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. इगतपुरीच्या वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून साकूर परिसरातून १० ते १२ रानडुकरे दारणा धरणाजवळ बागाईत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मिल्चिंगचे मोठे नुकसान करीत आहेत. शेतकरी त्यांना हाकलण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतात; मात्र त्यांच्यावरदेखील रानडुकरे हल्ला करीत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीत लावलेली काकडी, मका, टमाटा आदि पिकांची रानडुकरे नासधूस करीत त्यांनी हैदोस घातला आहे. रात्रीअपरात्री शेतीत पाणी भरण्यासाठी जाण्यासाठीदेखील शेतकरी जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी पंडित दामू गायकर, शिवाजी देवराम पागेरे, सिद्धार्थ शिरसाठ, सुरेश गायकर, बाळू गायकर, तानाजी पागेरे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात रानडुकरांचा धुडघूस; शेतकरी चिंतित
By admin | Updated: September 10, 2016 00:43 IST