नाशिक : जिल्ह्यात वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने अगोदरच भारनियमनामुळे त्रस्त जनतेला खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. दर पावसाळ्यात वीज वितरण व्यवस्था कोलमडत असल्यामुळे महावितरणच्या देखभाल-दुरुस्ती कामाचीही पोलखोल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात वीज यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा कंपनीकडून केला जात असला, तरी सक्षम कामे होत नसल्यामुळेच वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन ते तीन दिवस लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. शहरातील देवळाली कँप, सातपूर, सिडको, जुने नाशिक, गोविंदनगर, पंचवटी, भगूर, गंगापूर, आडगाव, सामनगाव, शिंदे, पळसे, गिरणारे, हरसूल आदि परिसरातील वीज यंत्रणा सातत्याने प्रभावित होत असल्याचे वीज कंपनीनेच म्हटले आहे. मालेगाव, निफाड, तसेच नगर जिल्ह्यातील घोडेगाव, राहुरी, नगर येथे वादळाच्या तडाख्याने अनेक झाडे आणि फांद्या वीजतारांवर पडल्यामुळे यंत्रणा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तर विद्युतखांब, रोहित्र उन्मळून पडले आहेत. गिरणारे उपकेंद्रात १५० फूट उंचीचा निलगिरीचा वृक्ष ३३ केव्ही वाहिनीवर पडल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक ठिकाणी विद्युत खांबांवरील इन्सुलेटर फुटून वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
शेकडो विद्युत खांब जमीनदोस्त
By admin | Updated: June 6, 2014 23:53 IST