चांदवड : शहरात आज, मंगळवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजासह सर्वच चिंतातुर होते. मात्र आजच्या पावसाने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.आज दिवसभर प्रचंड उकाडा होत होता. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी जोरदार पाऊस पडेल असे वाटत असताना मात्र अल्पशी हजेरी लावली; मात्र मंगळवारी अर्धा तासात संपूर्ण शहर जलमय झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.जून महिना पूर्णपणे कोरडा जातो की काय? या भीतीने नागरिक होते तर पाऊस पडला नसता तर तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते, अशी परिस्थिती असताना पावसाचे दुसऱ्यांदा आगमनाने काहीसे समाधान झाले आहे. मात्र या पावसाने दडी मारू नये, अशी अपेक्षा बळीराजा करीत आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला होता. परिणामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे खोळबंली होती. मात्र पूर्णपणे जून महिना कोरडा गेला आता शेवटी तरी या पावसाने दमदार हजेरी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.वणी : वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली, हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे मात्र पावसामुळे आठवडेबाजारात तारांबळ उडाली.दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. सुरुवातीला हलकासा पाऊस झाला तद्नंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही वेळेनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, आज मंगळवारी आठवडेबाजार असल्याने खरेदी व विक्री करणाऱ्या दोन्ही घटकाची बाजारतळ परिसरात गर्दी होती. व्यवसायाची वेळ असताना पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही घटकांची तारांबळ उडाली तर वणी - दिंडोरी रस्त्यावर विद्युतवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वीची तांत्रिक दुरुस्ती केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. (वार्ताहर)
चांदवड येथे जोरदार पाऊस
By admin | Updated: June 28, 2016 23:58 IST