नाशिक : गेल्या चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तपमान ४०.३ अंशांवर असून, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. एक दशकानंतर नाशिककर पुन्हा मार्चमध्ये एवढा प्रचंड उन्हाचा तडाखा अनुभवत आहे. गेल्या बुधवारपासून तपमानाचा पारा ३८ अंशांच्या घरात होता; मात्र रविवारी पाऱ्याने चाळिशी गाठल्याने तपमानाची नोंद ४०.१ इतकी करण्यात आली. रविवारपासून सातत्याने तपमानाचा पारा चढता असून, ४०.३ वर स्थिरावला असल्याने वातावरणात उष्मा कायम आहे. बुधवारी (दि.२९) ४०.३ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली. वाढत्या तपमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून, उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात आहे. दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. (प्रतिनिधी)
चार दिवसांपासून उष्णतेची लाट
By admin | Updated: March 30, 2017 00:31 IST