रेडगाव खुर्द : अल्पावधीत गुंतवणुकीच्या तिप्पट रकमेच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. ‘हाक ना बोंब’, ‘झटपट श्रीमंतीचा सोस नडला’ असेच त्यांच्याबाबत म्हणता येणार आहे. गुंतवणूकदार आता पैसे परत मिळावे यासाठी एजंटाकडे चकरा मारीत असल्याने एजंटही काय करायचं म्हणून हैराण झाले आहेत. सुरुवातीला तालुक्यात केबीसीच्या गुंतवणूकदारांची संख्या कमी होती. मात्र चांदवड येथील वर्धापनदिनानंतर एजंटामार्फत केबीसीचा गोरख धंदा फोफावला. खासगी व सरकारी बँकाच्या तुलनेत कंपनीकडून गुंतवणूकदारांना अल्पवधीत दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी बोटावर मोजता येतील इतक्या गुंतवणूकदारांना परतावा दिल्याचे सांगितले गेले. एजंटाना भरघोस कमिशन देऊ केलेले असल्याने एजंटानी विश्वास देऊन अनेकांचे लाखो रु पये बुडत्या जहाजात टाकले. तसेच काल-परवापर्यंत धड दुचाकी नसलेले तथाकथित एजंट आलिशान गाड्यांमधून फिरू लागल्याने त्याची चांगलीच भुरळ पडली. वडनेरभैरव, हरसूल, साळसाने, वाहेगावसाळ, काळखोडे, राहुड आदि गावातील गुंतवणूकदारांची संख्या मोठी असून, इतरही गावांमधून कमीअधिक प्रमाणात गुंतवणूकदार आहे. (वार्ताहर)
हैराण गुंतवणूकदार, हवालदिल एजंट
By admin | Updated: July 19, 2014 01:07 IST