नाशिक : नाशिक महापालिकेचे सर्व कर भरूनही म्हसरूळ गावातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत़ महापालिका प्रशासन सुस्त, तर नागरिक त्रस्त अशी सध्याची परिस्थिती आहे़ गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ गावातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून, या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिक सांगतात़ म्हसरूळच्या या समस्या न सोडविल्यास आगामी निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याचा मनोदयही नागरिकांनी बोलून दाखविला़म्हसरूळ गावातील रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून, एलईडी लाईट बसविण्याच्या नावाखाली या पथदीपांची दुरुस्ती केली जात नाही, तसेच घंटागाडी अनियमित असून तीचा कधीही ठावठिकाणी नसतो़ त्यामुळे पर्यायाने नागरिक घरातील जमा केलेला केरकचरा रस्त्यावर आणून टाकतात़ यामुळेही परिसराला दुर्गंधी येत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ गावातील नळांना गटारीच्या पाण्याचा वास येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़म्हसरूळ गावातील समस्यांबाबत मनसेचे नगरसेवक गणेश चव्हाण हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत़ या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याची भाषाही नागरिक बोलू लागले आहेत़ (प्रतिनिधी)