नाशिक : मंजूर पीककर्ज देण्यास नकार देणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या कारभाराविरुद्ध थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय बुधवारी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. गुरुवारी मोर्चाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. जिल्हा बॅँकेने निफाड, नाशिक व दिंंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जापोटी दिलेले धनादेश बॅँकेकडे पैसे शिल्लक नसल्याच्या कारणावरून परत आल्याची घटना घडल्यानंतर शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. द्राक्ष छाटणीची वेळ नजीक येऊन ठेपलेली असताना मजुरांसाठी मजुरी व द्राक्षबागांसाठी खते खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायखेडा, निफाड बाजार समितीत सकाळी शेतकऱ्यांची बैठक शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपापल्या येवला, नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करून अगोदरच त्याचे वाटप करून टाकल्याचा आरोप करण्यात आला. द्राक्ष उत्पादक शेतकरी दरवर्षी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करीत असताना यंदा राजकीय हेतूने प्रेरित होऊन शेतकऱ्यांना मुद्दामहून वंचित ठेवण्याचा प्रकार केला जात असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जात असेल व त्यातून जर शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग निवडला तर त्याला सरकार व जिल्हा बॅँक जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बॅँकेच्या या अनागोंदी कारभाराविरुद्ध थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत असलेले देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी निफाड तालुक्यातील हजारो शेतकरी नाशकात दाखल होणार आहेत.
पीककर्जासाठी मोर्चा
By admin | Updated: September 8, 2016 01:04 IST