कळवण : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीमध्ये जागावाटपावरून बिघाडी झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे दिसत असले तरी दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजूनही आघाडीची आशा असून, त्यासाठी अर्ज माघारीपूर्वी बैठक घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र याविषयीचे चित्र अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.मानपान नाटय आणि एक दोन जागांच्या मतभेदामुळे आघाडीचे घोडे अडले असल्याचे समजते. तर भाजप-सेना युती व मनसे स्वबळावर लढणार आहे. या नगरपंचायतच्या निवडणूकीपासून अलिप्त रहाणाऱ्यामाकपवर विरोधकांनी बोचरी टीका केली आहे. नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी एकही पक्षाला सतरा उमेदवार मिळाले नाही. राष्ट्रवादीने १६ काँंग्रेसने१२ भाजपने १२ शिवसेनेने४ तर मनसेने४ जागांवर उमेदवार दिले आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असून राजकीय पक्षांना ते डोकेदुखी ठरणार आहे. कळवणचे आमदार जे पी गावित यांनी नगरपंचायत निवडणुकीतउमेदवार उभे केले नाही, की त्यांना उमेदवारच मिळाले नाही, अशी उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माकपला कळवण शहर व तालुक्यात विकासकामे करण्यात अपयश आल्याने निवडणुकीला सामोरे जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांनी केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारांचे एबी फॉर्म पक्षांकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निलेश जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले (वार्ताहर )
कळवणला कार्यकर्त्यांना आघाडीची आशा
By admin | Updated: October 9, 2015 23:46 IST