रेडगाव खुर्द : गत वर्षी बरोबर आजच्या तारखेला भुईमुगाची पेरणी करीत असताना रेडगाव येथे उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला होता. रेडगावकरांच्या जीवाला चटका लावणाऱ्या या दुर्दैवी घटनेला आज वर्ष पूर्ण होत असताना आपत्तीग्रस्त कुटुंबाला महावितरणकडून देय मदतीची रक्कम देण्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.शेत शिवारात ठिकठिकाणी धोकादायक लोंबकळणाऱ्या वीज तारा, वाकलेले खांब वर्षानुवर्ष त्याच अवस्थेत आहे. जीवित व वित्तहानीला कारण ठरणाऱ्या वीज वितरण जाळ्याची दुरुस्ती वा नूतनीकरणाच्या कामाकडे वरिष्ठ पातळीवरून होणारे दुर्लक्ष सर्वश्रुत आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारानेच रेडगाव येथील एम.ए.बी.एड चे शिक्षण पूर्ण करून भावी शिक्षकाचे स्वप्न उराशी बाळगून शेतात हिरवं स्वप्न पेरणाऱ्या भगवान माधव काळे या युवा शेतकऱ्याचा गत वर्षी भुईमुगाची पेरणी करीत असताना शेतातील विजेच्या खांबाच्या ताणात(स्टे) उतरलेल्या वीजप्रवाहाच्या धक्याने मृत्यू झाला. याचवेळी एका बैलाचाही जागीच मृत्यू झाला होता, तर वडील माधव काळे यातून बालंबाल वाचले. भगवान हाच थकलेल्या वृद्ध माता-पित्याचा उर्वरित जीवनाचा आधार होता. पै-पै करून कष्टातून शिकविलेला भगवान मास्तर होईल व आपल्या कष्टाचे पारणे फिटतील हे माता-पित्यांचे व कुटुंबाचे सुखाचे इमले क्षणार्धात भुईसपाट झाले. चूक कोणाची अन् शिक्षा कुणालाच या न्यायाने घडलेल्या या घटनेला घडून आज वर्ष झाले. घटनेच्या पश्चात पंचनाम्यापासून सर्व कार्यवाही पूर्ण करून विभाग कार्यालयाने अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. दरम्यान, महावितरणकडून या आपत्तीग्रस्त कुटुंबाला देय आर्थिक नुकसानभरपाई वा मदत देण्यास अद्याप वरिष्ठ कार्यालयाला मुहूर्त सापडलेला नाही. याबाबत नाशिक ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवीनच पदभार स्वीकारल्याचे सांगत तातडीने या प्रकरणाच्या सद्यस्थिती बाबत चौकशी करून त्या कुटुंबाला लवकरच मदत देण्यात येईल असे सांगितले.दरम्यान महावितरणची दफ्तर दिरंगाई,विलंब बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
आपत्तीग्रस्त कुटुंबाला मदत देण्यास सापडेना मुहूर्त
By admin | Updated: June 20, 2014 22:04 IST