कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.बिरारी यांच्या नावे कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मध्य व पीक कर्ज असे अंदाजित तीन लाखांचे थकीत कर्ज आहे. गेल्या तीन वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे टाकलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता हयामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने ते सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. यातच रविवार (दि.१९) रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सटाणा येथील खाजगी दावाखाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात वृध्द वडील, अविवाहित दोन मुले, पत्नी, मुली असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (२१ बापू बिरारी)
कंधाणेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:03 IST