सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी ए. जी. दातीर यांनी केले आहे. शासन निर्णय कृषि व पदुम विभाग मंत्रालय ५ जुलै २०१४ अन्वये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व भारतीय कृषि विमा कंपनीच्या सहकार्याने विविध पिकांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेत सहभाग घेण्यासाठी दि. ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने राष्ट्र्ीय कृषि पिक विमा योजनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल या हेतूने ही पीक विमा योजना राबविण्यात आलेली असल्याची माहिती तालुका कृषि कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दातीर यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयात संपर्क साधन्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पीक विमा योजनेत सर्वसाधारण जोखीम स्तर पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला आहे. त्यात भात पिकासाठी ६० टक्के जोखीम असून प्रति हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम १५ हजार ठरविण्यात आली आहे. पुढील पिकांची (कंसात जोखीम) विमा संरक्षित रक्कम पुढील प्रतिहेक्टरी प्रमाणे: बाजरी- (६० टक्के) ६४००, मका-(६०)२१ हजार ४००, मूग- (६०)१२ हजार १००, भूईमूग- (६०) २३ हजार ८००, कांदा- (६०) ९७ हजार, सुरु उस- (८०) एक लाख ४४ हजार ३००, खोडवा (८०) एक लाख २४ हजार ३०० रुपये आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST