चांदोरी : शिवारासह चितेगाव, लालपाडी, खेरवाडी, शिंपी टाकळी आदी गावांतून जाणाऱ्या महापारेषणच्या अतिउच्च विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. मनोऱ्यासाठी कंपनीने अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने कंपनीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.याबाबत माजी सरपंच संदीप टर्ले यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन याबाबत योग्य तोडगा काढण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे.कृषक जमिनीचा वापर वाणिज्य वापरासाठी करणे बेकायदेशीर असून शेतात उभ्या असलेल्या पिकांना नष्ट करून मनोरे उभे केलेले आहे. अशा ठिकाणचे झालेले नुकसान व जमीन अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तसेच ज्या जमिनीवरून कृषक वाणिज्य वाहिनी गेल्या आहेत . त्याची नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पर्यायाने भविष्यात त्या जमिनीचा व्यावसायिक वापर केला जाऊ शकत नाही. यासाठी चांदोरीतील शेतकऱ्यांनी माजी सरपंच संदीप टर्ले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे.
महापारेषणने मनोरे उभारणी करतांना वीज वाहिन्या ओढताना जमिनीचा मोबदला हा रेडिरेकनरच्या तिप्पट देण्यात यावा अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेकडे केली.- संदीप टर्ले, माजी सरपंच.मनोऱ्यांचे काम पूर्ण झाले असूनदेखील मोबदला पुरेसा मिळलेला नाही. शासनाने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा.- भारत आहेर, माजी सभापती, गोदावरी सोसायटी, चांदोरी.