येवला : शुक्रवारी कांदा बाजारात उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली, तर अंदरसूल बाजारात तीन हजार क्विंटल कांदा आला. दोन्ही बाजारात कांद्याच्या भावात शुक्र वारी पुन्हा घसरण झाली आणि ३५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.येवला बाजारात उन्हाळ कांद्याचा भाव केवळ किमान १०० ते ५८० रुपयांपर्यंत होते. सरासरी ३५० रुपये क्विंटल भाव होते तर अंदरसूल मार्केट यार्डवर कांद्याचा बाजारभाव केवळ किमान १०० ते ६१५ रुपयांपर्यंत असून, ४०० रुपये क्विंटल असे होते. कांद्याच्या भावात सतत घसरण चालू आहे. कांदा मार्केटला विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याबाबत उदासीन असलेल्या शासनाच्या धोरणाबाबत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.राज्यासह देशांतर्गत व परदेशात स्थानिक पातळीवर कांद्याची आवक वाढल्याने कांदा भावात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती औजारे व मजुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये प्रतिक्विंटल झाला. आणि मातीमोल ३५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने संतप्त सवाल शेतकरी बाजार आवारात विचारीत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या वाईट दिवस आले असून, दिवसेंदिवस यात भर पडत आहे. यापुढील पीक घेण्यासाठी उपलब्ध कांद्याला भाव मिळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
कांद्याच्या भावात पुन्हा घसरण
By admin | Updated: September 10, 2016 00:42 IST