नाशिक : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे सुमारे २२ हजार हेक्टरवरील बाधीत झालेली पिके अशा परिस्थितीत जिल्हा बॅँकेने पीककर्ज देण्यास दिलेला नकार, पुरात वाहून गेलेला घर-संसार उभा करण्यासाठी शासनाकडून असलेली मदत अशा एक नव्हे तर अनेक अपेक्षा जिल्हावासीय मुख्यमंत्र्यांच्या नाशिक भेटीत बाळगून असून, ते काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी नाशकात दाखल होत असून, या भेटीत राजकीय पक्ष, संस्था, संघटना, शेतकऱ्यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यात प्रामुख्याने गेल्या महिन्यात १ ते ८ आॅगस्ट दरम्यान नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत २२ हजार हेक्टरवरील शेती पिके वाहून गेल्याने त्याचा फटका ७९ हजार शेतकऱ्यांना बसला. त्याचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांनी पूर्ण करून अहवाल प्रशासनाला सादर केला असून, कृषी खात्याकडून अद्याप अनुदान मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शासनाच्या नियमानुसार अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त असताना महिना उलटूनही त्याबाबत शासनाने काही पावले उचलली नाहीत. असे असताना दुसरीकडे जिल्हा बॅँकेने पीककर्ज मंजूर करूनही ऐन हंगामाच्या तोंडावर पैसे नसल्याचे कारण पुढे करीत हात वर केले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाखाहून शेतकरी पीककर्जामुळे वंचित असून, त्यांचे पिके धोक्यात आली आहेत. त्याच बरोबर गेल्या महिन्यात जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून, अनेकांची पडझड होऊन संसारपयोगी वस्तूंची नासधूस झाली आहे. शासनाने फक्त घरांची पडझड झालेल्या अधिकृत घरांनाच आर्थिक मदत दिली, परंतु पूररेषेत वा अनधिकृत घरे बांधून राहणाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले. तसेच संसारपयोगी साहित्यासाठी शासकीय सानुग्रह अनुदानही सरकारने देऊ केलेले नाही, अशा पूरग्रस्तांचेही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
अतिवृष्टी मदतीची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
By admin | Updated: September 8, 2016 01:01 IST