नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत शनिवारी बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. रविवारीही ही मोहीम सुरूच राहणार असून, सोमवारी अखेरचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याने मोठ्या प्रमाणावर आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्याने त्याची दखल घेत, मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून शनिवार, रविवार या दोन दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सकाळी दहा वाजेपासून त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी व त्या त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. गेल्या शनिवारी नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या मतदारांनी आज आवश्यक त्या कागदपत्रांसह त्याची पूर्तता केली. काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता, तर काही ठिकाणी दिवसभर मतदारांचा राबता होता. उद्या रविवारीही ही मोहीम सुरू राहणार आहे. सोमवारी मात्र पुन्हा त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर मात्र पुरवणी मतदार यादीतच कदाचित ही संधी मतदारांना मिळू शकते.