नाशिक : व्यापारी, उद्योजकांचा वीज दरवाढीला आधीच विरोध असताना महावितरण कंपनीने पुन्हा नव्याने वीजदरवाढीचा प्रस्ताव शासनास सादर केल्याने संत्रस्त उद्योजक, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीजबिलांची होळी केली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर अधिक असल्याने आपल्याकडील मोठे उद्योग राज्याबाहेर स्थलांत्तरित होत आहेत. गेल्यावर्षी वाढविलेल्या विजेच्या दरांमुळे उद्योजक संघटनांनी राज्यभर आंदोलने करून याबाबतचा निषेध नोंदविला होता. प्रस्तावित वीज दरवाढ अतिशय जाचक असून, वीजदरवाढ त्वरित रद्द करावी, अशा घोषणा देत उद्योजक, व्यापारी संघटनांनी वीजबिलांची होळी केली. दरम्यान, आंदोलनापूर्वी उद्योजकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन वीजदरवाढीमुळे जिल्ह्यातील मोठे उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या विचाराधीन असल्याचे निदर्शनास आणून दिले, तर आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनस्थळी उद्योजकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी निमा अध्यक्ष रवि वर्मा, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, ऊर्जा समिती अध्यक्ष सुधाकर देशमुख, आयमा अध्यक्ष विवेक पाटील, वीज ग्राहक समितीचे अॅड. सिद्धार्थ सोनी, मनीष कोठारी, लघु उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, नीलिमा पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उद्योजकांकडून वीजबिलांची होळी
By admin | Updated: February 27, 2015 23:40 IST