नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने मे ते सप्टेंबर यादरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्णातील ५९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १४९ ग्रामपंचायतींच्या २५७ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या मंगळवारपासून नामांकन भरण्यात येणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, दि. ३० मार्च रोजी जारी करण्यात येणार असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकने स्वीकारली जातील. ८ एप्रिल रोजी छाननी, १० रोजी माघार व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ रोजी मतदान घेण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येईल. या निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तप्त झाले असून, गेल्या महिन्यातच निवडणूक होऊ पाहणाऱ्या ग्रामपंचायतींच्या वॉर्डरचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णातील तेरा तालुक्यांत ५९५ इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यात सर्वाधिक मालेगाव (९९) व त्या खालोखाल (९८) सिन्नर तालुक्यात आहेत. गेल्या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी अनेक ग्रामपंचायतींना राखीव जागांसाठी उमेदवारच न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांसाठीही याचवेळी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्ह्णात १४९ ग्रामपंचायतींच्या २५७ जागा रिक्त आहेत. विशेष करून नाशिक वगळता आदिवासी तालुक्यांमध्येच या जागा रिक्त आहेत. चौकट==तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायती (कंसात पोटनिवडणुकीच्या रिक्त जागा)नाशिक- २३ (२४)दिंडोरी- ५२ (३७)इगतपुरी- १ (२३)कळवण- ३० (१२)त्र्यंबकेश्वर- ३ (२२)देवळा- १० (१७)बागलाण- ३८ (७२)पेठ- ० (५)सुरगाणा- ० (२)मालेगाव- ९९ (१२)चांदवड- ५५ (६)नांदगाव- ५९ (९)निफाड- ६२ (११)सिन्नर- ९८ (०)येवला- ६५ (५)
२५७ जागांसाठी पोटनिवडणूक ५९५ ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात निवडणुका
By admin | Updated: March 26, 2015 00:42 IST