गायत्री जेऊघाले, नाशिकवर्ष सरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सोशल मीडियावर नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. अनेक अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, स्वत: तयार केलेले संदेशही पाठविले जात आहेत. मात्र, शुभेच्छापत्रांच्या बाजारपेठेत कोणताही उत्साह दिसत नाही. सोशल मीडियामुळे ही बाजारपेठ ठप्प असून, अनेक विक्रेत्यांकडे पूर्वीच्या मागणीच्या तुलनेत पाच ते दहा टक्के इतकाच प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत ही जणू परंपराच बनत चालली आहे. नव्या वर्षाला नव्या उत्साहाने सामोरे जाताना शुभेच्छापत्रांचा वर्षाव होत असतो. विविध कंपन्यांची भेटकार्डे त्यासाठी बाजारात येतात. इतकेच नव्हे तर खास हाताने तयार केलेली शुभेच्छापत्र पाठविण्याचा आनंदही विरळाच. मात्र मोबाइल आणि अॅँड्रॉईड फोन आल्यापासून शुभेच्छापत्रांचा वापर नगण्य झाला आहे. सध्या तर महिनाभर आधी शुभेच्छा देणारा पहिला मीच असे आगावू संदेश देण्यापासून फोटोशॉप किंवा अन्य अनेक अॅपचा वापर केला जातो. त्यापलीकडे जाऊन दिवाळीप्रमाणेच अन्य अनेक अॅप सध्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे अॅपमधून आलेल्या लक्षवेधी शुभेच्छा पाठविण्याची क्रेझही यंदा बळावते आहे. जंक एसएमएस, त्याचबरोबर सोशल मीडियावर म्हणजेच व्हॉट्स, हाईक यांसारखे अॅपवर आप्तेष्ट मित्रमंडळीच्या गु्रपवर एकाचवेळी शुभेच्छा देण्याची सोय असल्याने त्याचा वापर खूपच वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून शुभेच्छा पत्रांच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. केवळ नववर्षच नाही तर अन्य सण किंवा डेजसाठीही मोबाइलचा वापर होत असल्याने शुभेच्छापत्रांचा वापर खूपच कमी झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यापूर्वी मागविण्यात येणाऱ्या शुभेच्छापत्रांमध्ये दिवसेंदिवस घट होत असून, आता पूर्वीपेक्षा पाच ते दहा टक्के मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सोशल मीडियामुळे शुभेच्छापत्रांची बाजारपेठ ठप्प
By admin | Updated: December 5, 2015 23:09 IST