दत्ता दिघोळे नायगावकधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातून चांगलेच पाणी काढले आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने व उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सततच्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या कष्टकरी शेतकरीवर्गाला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाऱ्या हवामानाशी दोन हात करूनही बाजारात मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे पुरता जेरीस आलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षी खरीप हंगामात खराब हवामानामुळे वाया गेला होता, तर रब्बीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.बाजारात रब्बीच्या कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केलेल्या खर्चाचीही वसुली होत नसल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सतत बदलणारे हवामान, खते, औषधांच्या वाढलेल्या किमती व दिवसेंदिवस वाढणारी मजुरी आदिंचा सामना करत पिकवलेला कांदा बाजारात ४५० ते ५५० रुपये दराने विकला जात असल्याने हातात पडणाऱ्या या रकमेत उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी केलेल्या खर्चाची वसुलीही होत नाही तेथे कर्जाची फेड कशी करायची या मानसिक वेदनेने त्रस्त झाला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेकडे राजकीय नेते व मीडियाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. ग्राहकांना वाढलेल्या भावाची मिरची लागली की सुरू होणारी नेतेगिरी व वारंवार दाखवल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे गौडबंगाल शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. यंदाचा सर्वच हंगाम वाया गेल्यानंतर मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी कोणालाच का दिसत नाही व ते पुसण्यासाठीही कोणीच का पुढे येत नाही, असा आर्त सवाल विचारला जात आहे.
कांदा भावातील घसरणीमुळे शेतकरी अडचणीत
By admin | Updated: May 4, 2016 22:29 IST