आझादनगर : राज्यात व देशात गेल्या काही दिवसांपासून समाजकंटक सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मालेगाव शहरवासीयांनी शांतता राखून शांतता प्रिय शहर असल्याचे दाखवून दिले असून, या शहराने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले. पत्रकारांशी संवाद साधताना मोहिते बोलत होते.यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक योगेश चव्हाण उपस्थित होते. मोहिते म्हणाले की, ज्यांच्या भ्रमणध्वनी संचावर विटंबनात्मक चित्रे येतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा किंवा चित्र काढून टाकावे. विनाकारण दुसऱ्यांना पाठवू नये, अन्यथा अशा कृती करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. शहरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. गतसाली शब-ए-बारात निमित्ताने पोलिसांना सहकार्य करणाऱ्या २०० स्वयंसेवकांचा मंगळवारी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली. (वार्ताहर)