नाशिक : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची राज्यस्तरीय परिषद नुकतीच नाशिकला होऊन त्यात कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ठराव संमत करण्यात आला.येथील एकलव्य निवासी शाळेच्या सभागृहात आयोजित राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी व प्रकल्प कार्यकारिणीची राज्यस्तरीय प्रतिनिधी परिषद झाली. या प्रतिनिधी परिषदेमध्ये शासकीय आश्रमशाळांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. चर्चेमध्ये ग्रामीण भागामध्ये पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढत आहे. तसेच आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना मोेठ्या प्रमाणात कार्यान्वित केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची योजना असल्याने शासकीय आश्रमशाळेकरिता विद्यार्थी मिळण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या बाबी विचारात घेता बाजारपेठेच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गावी त्या परिसरातील तीन ते पाच शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थी एकत्रित करून त्यांना या बाजारपेठेचे ठिकाण अथवा तालुक्याच्या ठिकाणी आणून मुख्य प्रवाहात आणण्यात यावे, असा ठराव परिषदेत संमत करण्यात आला. यावेळी परिषदेस संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, उपाध्यक्ष बी. टी. पाटील, सुभाष बावा, संजय जाधव, नवनित किल्लारीकर, रवींद्र चौधरी, आर. एस. हाश्मी, भालचंद्र बोर्हाडे आदिंसह राज्यातून १५० कार्यकारिणी प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा
By admin | Updated: May 27, 2014 01:13 IST