पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलनजीक आलिशान कार्यालय असलेल्या केबीसी मल्टीट्रेड या कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ त्यातच कंपनीचे मुख्य संचालक सिंगापूरला कुटुंबासह स्थायिक झाल्याची चर्चा असून, गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ मात्र पैसे परत मिळत नसूनही एकही गुंतवणूकदार तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांपुढे तपासाबाबत अडचण आहे़के.बी़सी़ मल्टीट्रेड प्रा़ लि़, नाशिक या कंपनीचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना तीस महिन्यांत गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले़ त्यानुसार कंपनीतील बिझिनेस, रेग्युलर, डीलक्स, महाराजा, क्लब, हॉली डे यांसारख्या योजनांमध्ये सात हजार २०० रुपयांपासून एक लाख आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये गुंतविले़सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा मिळाला; मात्र नंतर अनियमितता आल्यामुळे फ सवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत काही गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या विरोधात पोलिसांकडे निनावी तक्रारी केल्या आहेत़ त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात संचालक चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यानंतर सिंगापूरहून भारतात आलेल्या चव्हाण यांना अटक केली असता त्यांनी न्यायालयात कोणाचीही फ सवूणक केली नसल्याचे सांगितले़ न्यायालयाने त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे व पोलीस ठाण्यात हजेरीचे आदेश दिले होते़ यानंतर संचालक चव्हाण यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून पासपोर्ट परत मिळविला व सिंगापूरला निघून गेले़ दरम्यान, आता पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ तर पैसे गोळा करणाऱ्या एजंटांवर दबाव वाढला आहे.(वार्ताहर)