दिंडोरी : धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी शहरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत असून, जिल्हा प्रशासनाने वाघाड धरणातून पाणी सोडण्याबाबत दाखवलेली उदासीनतेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धरण उशाशी अन् कोरड घशाशी असी म्हणण्याची वेळ दिंडोरीकरांवर आली आहे. मागील महिन्यातही ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला सहा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. पुन्हा तीच अवस्था झाली असून, पुढील पावसाळ्यापर्यंतचे आवर्तनाचे नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी दिंडोरीवासीयांनी केली आहे.दिंडोरी शहराला वाघाड धरणातून पाणी कोळवण नदीत सोडून तेथील पाणीपुरवठ्याच्या साठवण बंधाऱ्यात साठवून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सदर बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाची मागणी करण्यात येऊन त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे मात्र सध्या धरणातील पाणीसाठा कमी असल्याने धरणातील पाणी सोडण्याबाबत सर्वस्वी अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असून, त्याची परवानगी न मिळाल्याने वाघाड धरणातून पाणी सोडले न गेल्याने दिंडोरीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील महिन्यात अशीच अवस्था होत कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. दिंडोरी शहराचे बहुतांशी भागात सहा-सात दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. विविध हातपंपावर महिला वर्गाला पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. दिंडोरी शहरातील अनेक खासगी कूपनलिकांचे पाणी आटले असून, नोव्हेंबरमधेच असे हाल तर पुढील सात-आठ महिने पावसाळ्यापर्यंत किती हाल होणार याची चिंता नागरिकांना सतावत आहे. दिंडोरीकरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू असून, ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत त्वरित पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.ओझरखेड धरणातून थेट पाइपलाइन योजनेचे काम पाच वर्ष रेंगाळत पुन्हा सुरू होत प्रगतिपथावर आहे; मात्र संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेली आश्वासने फुसके ठरल्याने प्रत्यक्षात दिंडोरीकरांना हे पाणी कधी मिळेल याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे किमान हे वर्ष तरी वाघाड धरणाचे आवर्तनावर विसंबून राहावे लागणार असून, धरणात अल्पसाठा असल्याने व यंदाची टंचाई परिस्थिती पाहता पाणीटंचाईचे सावट अधिक तीव्र होणार आहे.दिंडोरी शहरात अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने दोन - चार दिवसाआड पाणी आले तरी पुरेसे पाणी गृहिणींना भरता येत नसून काही ठिकाणी अधिक वेळ अधिक दाबाने पाणीपुरवठा होत असताना काही भागात पाणीच मिळत नसल्याची तक्रार आहे. शहरात समान पाणीवाटपाचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वांना पाणी मिळेल. याबाबत वारंवार तक्र ार करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे दिंडोरीच्या धरणांवर जिल्ह्यातील इतर काही गावांना नियमित पाणीपुरवठा होत असताना दिंडोरीकरांवर अन्याय का असा सवाल करत चार दिवसांऐवजी दोन दिवसाने पाणीपुरवठा करावा व सर्व भागात समान पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, असे नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
दिंडोरी : वाघाड धरणातून पाणी न सोडल्याने नाराजी
By admin | Updated: November 25, 2015 22:28 IST