नाशिक : साधुग्राममध्ये वसलेल्या वारकरी संप्रदायाच्या खालशांमध्ये भजन-कीर्तनाच्या माध्यमातून धर्मजागर सुरू झाला असून, रोज हजारो वारकऱ्यांची हजेरी लागत आहे. निर्माेही अनी आखाड्यांतर्गत सात खालशांचे मंडप उभे राहिले आहेत. त्यामध्ये संत जगद्गुरू तुकाराम महाराज खालशाचे डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, जगद्गुरू नामदेव महाराज खालशाचे अनंतदास महाराज कजवाडीकर, जगद्गुरू एकनाथ महाराज खालशाचे अमृतदास महाराज जोशी, माउलीराम खालशाचे रघुनाथदास महाराज देवबाप्पा, संत गाडगे महाराज खालशाचे ईश्वरदास महाराज चऱ्हाटे, संत निवृत्तिनाथ महाराज खालशाचे काशीनाथदास महाराज पाटील या खालशांसह महाराष्ट्र वारकरी संस्थान खालसा आदिंचा समावेश आहे. या खालशांमध्ये रोज पहाटे ४ वाजता काकड आरतीने धर्मजागरला प्रारंभ होतो. त्यानंतर सकाळी ७ ते १२ या वेळेत जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगवाणी व पारायणांचा उद्घोष केला जात आहे. याशिवाय विश्वाच्या कल्याणार्थ विष्णूयागाचेही आयोजन करण्यात आले असून, वेदमूर्ती मकरंदशास्त्री गर्गे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंद पौरोहित्य करत आहेत. तसेच रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कीर्तने होत असून, त्यात नामवंत कीर्तनकार बंडातात्या कराडकर, माधव महाराज गुणे, संदीपन महाराज गुणे, पांडुरंग महाराज गुणे, बाळासाहेब महाराज देहूकर, उद्धव महाराज मंडलिक, मारुती महाराज पुरेकर, केशवदास महाराज नामदास आदिंचा समावेश आहे. याशिवाय रात्री संगीत भजनांचाही कार्यक्रम सुरू असल्याची माहिती श्री महंत डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी दिली.
वारकरी संप्रदायाच्या खालशात धर्मजागर
By admin | Updated: August 23, 2015 23:26 IST