येवला : दुष्काळामुळे हरणांवर वणवण भटकण्याची वेळयेवला : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वन्यजीव हरणांसाठी कृत्रिम पाणी साठवण टँक तयार करण्याची मागणी येथील तहसीलदार शरद मंडलिक यांच्याकडे परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सध्या येवला तालुका दुष्काळाच्या गर्तेत सापडला असून, आगामी काही दिवसांत पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. सध्या परिसरातील हरणांसह अन्य वन्यप्राणी रस्त्यावर कळपाने पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत. हरणाच्या कळपाच्या मातुलठाण येथील कावेरी दाणे येथे झालेल्या अशाच अपघातात १५ वर्षीय विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले, तर एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेत परिसरात वन्यजिवांसाठी कृत्रिम पाण्याचे साठे तयार करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील राजापूरसह सर्वच क्षेत्रांत अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी रणजित संसारे, गोरख सुरासे, नितीन संसारे, बाळासाहेब वाल्हेकर, जितेश गायकवाड, दत्तात्रेय जमधडे, संजय पवार, ज्ञानेश्वर जमधडे, गंगाधर संसारे, सुधाकर वाल्हेकर आदिंसह ग्रामस्थांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. (वार्ताहर)
पाणीसाठा तयार करण्याची मागणी
By admin | Updated: November 16, 2015 21:59 IST