पिंपळगाव : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांदा या शेतीमालास ७०० ते १८६१ असा साधारण भाव मिळत असूनही केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य शून्य असताना ते ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य संपूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कमीत कमी ७०० व जास्तीत जास्त १८६१ व सरासरी १३११ असून , शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसतानादेखील केंद्र शासनाने अशा प्रकारे घाईघाईमध्ये कांद्यावरील किमान निर्यात मूल्य ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. असे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी म्हटले आहे. सटाणा : कांदा निर्यात मूल्य ३०० डॉलरने वाढविल्याने कांद्याचे दर कमी झाले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असून, सदरची मूल्यवाढ रद्द करावी या आशयाची मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय प्रातांधिकारी संजय बागडे यांना देण्यात आले आहे. केंद्र शासनाने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़प्रांताधिकारी बागडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे गत दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यात मूल्यात अचानक केलेली दरवाढ ही कांदा उत्पादकांवर अन्यायकारक ठरलेली आहे. दोन दिवसांपासून कांदा कमी भावात खरेदी होऊ लागला आहे. यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कांद्याचे उत्पादन घेत असताना उत्पादनात घट होऊन खर्चदेखील वाढला आहे. तुलनेने कांद्याला हवा तसा भाव नाही. मिळणारा भाव हा अत्यंत तुटपुंजा स्वरूपाचा आहे. नवेदनावर संजय पवार, देवीदास निकम, युवराज देवरे, नितीन वाघ, दीपक वाघ, संतोष पगार, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
कांदा निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी
By admin | Updated: June 20, 2014 22:02 IST