इगतपुरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आज इगतपुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराचा यावेळी निषेध करून विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार जितेंद्र केदारे यांना देण्यात आले आहे. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी लोकांच्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्वरित उभारण्यात यावा, भावली धरणासह भाम, वाकी - खापरी, मुकणे व इतर धरणग्रस्तांना नुकसानभरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, गोरगरीब लोकांना पिवळे रेशनकार्ड त्वरित देण्यात यावे, केशरी कार्डधारकांना दरमहा धान्य पुरवठा करण्यात यावा, वाढती महागाई नियंत्रणात आणावी, दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे आदि मागण्यांचा यात समावेश आहे. याप्रसंगी आदिवासी सेनेचे दि. ना. उघाडे यांच्यासह जगन जोशी, नामदेव भडांगे, रॉबी गिल्डर, संतोष सोनवणे, नंदाताई जोशी, सुमन म्हसणे, कचरू तेलम, बंडू उबाळे, युवराज करतुले, राजाबाई ससाणे, शोभा सोनवणे, ताराबाई कार्तुले, हौसाबाई थापर, विनता शिंदे, सुरेख जमादार, लक्ष्मीबाई कांदीलकर, छाया गायकवाड, नर्मदा तेलम, सरिता माळी, ललित कसबे, कलाबाई तेलम, सरूबाई तेलम, यमुना तेलम व आदि सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
आदिवासी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन
By admin | Updated: May 29, 2014 16:28 IST