सातपूर : नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावाची प्रमुख द्राक्ष उत्पादक गाव म्हणून ओळख असली तरी ती ओळख यावर्षी पुसट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांना द्राक्ष पिकाबाबतीत विविध समस्या भेडसावत असून, उत्पादनात घट होण्याचे चिन्हे दिसत आहेत. परिसरात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. टमाटा पिकाने शेतकऱ्यांना कर्जबाजारी केल्याने अनेकांच्या आशा आता द्राक्ष पिकाकडे लागल्या असताना द्राक्ष घडावर सन बर्ग (मनी कुज)चे प्रमाण वाढले आहे. अनेक उपाय करूनही कुठलाच परिणाम होत नसल्याने अखेर नेटने बाग आच्छादित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नेटचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यात बँकांकडून होणारा कमी पतपुरवठा व वाढता खर्च तोंडाशी आलेली पिके , चांगला भाव मिळेल की नाही अशा अनेक समस्यांच्या कात्रीत शेतकरी अडकलाय. (वार्ताहर)
विविध समस्यांमुळे द्राक्ष उत्पन्नात घट
By admin | Updated: January 20, 2017 23:27 IST