संजय शहाणे इंदिरानगरजनावारांच्या हाडांच्या गुदामाबाबत अनेकदा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचे चित्र आहे. शिवाजीवाडीतील जनावरांच्या हाडांचे गुदाम नासर्डी नदीलगत हलविण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. मात्र गुदाम अद्यापही हलविण्यात आले नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिकेने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शिवाजीवाडीतील जनावरांच्या हाडांचे गुदाम भरवस्तीतून हलविण्याचा निर्णय होऊन सदर गुदाम हे नासर्डीलगत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाची महापालिकेने अद्यापही अंबलबजावणी केली नसल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न कायम आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील गुदामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पालिकेकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महापालिका प्रशासन सदर गुदाम हलविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेच्या भूमिकेविषयीची उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरात सुमारे ६०० ते ७०० घरे आहेत. शिवाजीवाडीत तर सुमारे पंधरा वर्षांपासून अनधिकृतपणे सहा ते सात जनावरांच्या हाडांची गुदामे राजरोसपणे सुरू आहेत. शहरातील कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची हाडे या गुदामात आणली जातात. या ठिकाणी या हाडांवर प्रक्रियादेखील केली जात असल्याची चर्चा आहे. दिवसभर येथे ट्रकमधून हाडे आणली जात असल्याने येथील कारभाराची व्यापकताही यामुळे लक्षात येते. या गुदामात हाडे साठविली जात असल्याने आणि त्यावर प्रक्रिया केली जात असल्यामुळे गुदामातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शिवाय हाडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचादेखील त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. सदर गुदाम भरवस्तीत असल्याने अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे नागरिकांना कसबसे येथे रहावे लागत आहे. पालिकेने या गुदामांवर कारवाई करण्याचे संकेत अनेकदा दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हाडांचे गुदाम हलविण्याचा निर्णय कागदोपत्रीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 22:42 IST