नाशिक : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एलईडी दिव्यांच्या संदर्भातील न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कोट्यवधी रुपयांच्या फिटिंग्ज खरेदी पालिकेने थांबवली होती; परंतु एलईडीच्या विरोधातील याचिका निकाली निघाल्याने फिटिंग्जचा प्रश्नही सुटला असून, शहरात एलईडी फिटिंग्ज बसविण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गेल्या दीड- दोन वर्षांपासून पालिकेच्या अहासापोटी अंधारात राहाव्या लागणार्या नागरिकांना आता उजेड मिळणार आहे.महापालिकेने संपूर्ण शहरातील सुमारे ७७ हजार लाईट फिटिंग्जमध्ये एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. या योजनेसाठी पालिकेने निविदेत ठरविलेल्या अटी आणि विशिष्ट ठेकेदारावर केलेली मेहरनजर यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एलईडी दिवे बसविण्याच्या अहासापोटी शहरातील ज्या जागात पथदीप नादुरुस्त आहेत किंवा दिवे निकामी झाले आहेत तेथे पालिकेने नवीन दिवे बसवले नाही. दोन वर्षांत सुमारे साडेचार कोटी रुपयांची खरेदी रोखण्यात आली होती, असे विद्युत विभागाच्याच सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक रस्ते पथदीपांअभावी अंधारात होते. नागरिकांनी तक्रारी करूनही साहित्यच खरेदी झालेली नाही, असे सांगून प्रशासनातील अधिकारी एलईडी दिव्यांसाठी हटून बसले होते. मात्र याच वर्षी उच्च न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळली. पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेदेखील याच महिन्यात विरोधकांचे अपील फेटाळले. त्यामुळे एलईडी फिटिंग्ज बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किंबहुना अगोदरच सुरू झालेल्या या कामाला ठेकेदाराने गती दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते आता एलईडीने उजळणार आहेत...इन्फो...सहा महिन्यांत काम पूर्ण होणारशहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. पाच ते सहा महिन्यांत संपूर्ण शहरात पथदीपांमध्ये एलईडी दिवे बसविण्याचे काम पूर्ण होईल.- ॲड. यतिन वाघ, महापौर
अंधार हटणार, उजेड पडणार महापालिका : एलईडीचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार
By admin | Updated: May 27, 2014 01:11 IST