कनाशी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.या केंद्राला ३४ गावे आणि आठ पाडे जोडण्यात आली आहेत. या गावांची लोकसंख्या सुमारे ४० हजारांवर आहे. मात्र उपचार करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास चव्हाण यांची नांदेड येथे प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर केंद्राचा भार आहे. त्यातही दर महिन्याला आवश्यक कामासाठी त्यांना वारंवार बाहेर जावे लागते त्यामुळे सदरचे प्राथमिक आरोग्य डॉक्टराविना ओस पडलेले असते. सध्या टायफाईड, मलेरिया, डेंग्यू आदि साथींच्या आजारांची लागण झाली असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आदिवासी जनतेला सरकारी दवाखाना नको बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त मलेरियाची चाचणी करण्यात येते. टायफाईड किंवा इतर तपासणीसाठी खासगी लॅबकडे जावे लागत असल्याने रुग्णांना भुर्दंड पडत आहे. रुग्ण कल्याण समिती फक्त कागदावरच कामकाज करत असल्याचा आरोप यानिमित्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ
By admin | Updated: August 22, 2014 00:27 IST