नाशिक : काेरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने अखेर नाशिकमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची घोषणा केली असून विनामास्क फिरणाऱ्यांना हजार रुपये दंड तसेच प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. पालकमंत्री छगन भुजबवळ यांनी रविवारी दुपारी भुजबळ फार्म येथे कोरेाना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे जाहीर केले. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्ण संख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १७३१ पर्यंत पोहचली. मागील पाच दिवसात तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले.
संचारबंदीच्या काळात रस्त्यावर उगाच फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहे. तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे विनामास्क फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन हजार रुपये दंड आकारतील, अशीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत आदी उपस्थित होते.
--इन्फो--
अत्यावश्यक सेवा राहाणार सुरू
रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहाणार आहे. दूध वितरण, भाजीपाला, वृत्तपत्र विक्रेते, मेडिकल्स, दवाखाने या सेवा सुरूच राहणार आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्यांनी योग्य ती माहिती पोलिसांना देणे आवश्यक राहाणार आहे.
--इन्फो--
नाशिककरांच्या प्रतिसादावर पुढील निर्णय अवलंबून
रात्री ११ ते पहाटे ५ अशी संचारबंदीची वेळ आहे. मात्र नागरिकांनी या संचारबंदीचे पालन केले नाही तर आणखी कडक निर्बंध लावले जातील. मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले आणि रुग्ण संख्या वाढतच गेली तर संचारबंदीची वेळ रात्री आठ, नऊ किंवा दहादेखील होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
--इन्फो--
मास्क वापरणे सक्तीचे
यापुढे प्रत्येकाला मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क वावरणाऱ्यांना एक हजारांचा दंड तसेच गुन्हादेखील दाखल केला जाणार आहे. तशा सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत.
--इन्फो--
लग्न सेाहळ्यातून अधिक प्रादुर्भाव
जिल्ह्यात हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्न सोहळ्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे आता अशा लग्न सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. गर्दी जमविणाऱ्या लॉन्स चालकांनादेखील याबाबतची समज दिली जाणार आहे.
--इन्फो--
गोरज मुहूर्तावरील लग्नांवर येणार निर्बंध
गोरज मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्याला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अशा मुहूर्तावर होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर आता पोलिसांची नजर राहाणार आहे. शक्यतो दुपारी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारंभ असा कार्यक्रम मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत करण्याचा सल्लादेखील भुजबळ यांनी नाशिककरांना दिला. लग्न सोहळ्यासाठी यापुढे केवळ शंभर जणांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
--इन्फो--
पोलीस पोहचणार लग्न सोहळ्यात
लग्न सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन मास्क नसलेल्या वऱ्हाडींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे लग्न कार्यात विनामास्क आढळून आल्यास तेथेच दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.