पेठ : पावसाळ्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पेठ तालुक्यातील नागरिक पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करत असून, पावसाळ्याची तयारी सुरू झाली आहे़पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी घरावर प्लॅस्टिक कागद टाकले जातात, तर अंगावर घेण्यासाठीही याचा घोंगडी म्हणून वापर केला जातो तसेच विविध प्रकारच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्या असून, लहान मुले व मोठ्या माणसांसाठी रेनकोट खरेदी केले जात आहेत़ पेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खास पावसाळी चप्पल वापरली जाते, तर पारंपरिक लोकरच्या घोंगडीलाही मोठी मागणी असते़ सध्या पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे, खडकी येथील आठवडे बाजारात या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येते़मागील वर्षापेक्षा यावर्षी जवळपास सर्वच वस्तूंच्या भावात दीडपटीने वाढ झालेली असली तरीही गरज म्हणून अशा वस्तू खरेदी करणे नागरिकांना भाग पडत आहे तर दुसरीकडे आदिवासी शेतकऱ्यांचे संरक्षक कवच म्हणून परिचित असलेले इरले तयार करण्याची लगबग सुरू आहे़ खास करून भाताची व नागलीची लावणी करताना दोन्ही हात मोकळे रहावेत आणि पावसाचे पाणीही लागू नये यासाठी हे इरले विशिष्ट प्रकारे तयार करण्यात येत असते़ बांबूच्या पट्ट्यापासून इरले तयार करून त्याला सागाचे पाने किंवा प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन दिले जाते़ गावागावात वयस्कर माणसे हे इरले विणताना दिसून येतात तर बाजारातही विक्रीसाठी आणले जात आहेत़
आठवडे बाजारामध्ये गर्दी
By admin | Updated: June 7, 2014 00:32 IST